विधानसभा निवडणुका आता काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे राज्यातील प्रत्येक राजकीय पक्षाने जोरदार मोर्चेबांधणीला सुरवात केली आहे. भाजपने आपली सत्ता अबाधित ठेवण्यासाठी महाजानादेश यात्रा काढली आहे. तर भाजप बरोबर युतीत असलेल्या शिवसेनेने देखील पक्ष मजबुतीसाठी जन आशीर्वाद काढली आहे. दुसरीकडे गळती लागलेल्या राष्ट्रवादी पक्षाने देखील पक्ष मजबुतीसाठी शिवस्वराज्य यात्रा काढली आहे. तर आता राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खा. सुप्रिया सुळे देखील संवाद दौरा काढून महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधणार आहेत.

23 ऑगस्टपासून या दौऱ्याचा पहिला टप्पा सुरू होणार आहे. ह्यात सहा जिल्ह्यात सुप्रिया सुळे संवाद साधणार आहेत.राज्यातील पूरपरिस्थिती, दुष्काळ, बेरोजगारी, महिला सुरक्षा, सरकारचा ढिसाळ कारभार या पार्श्वभूमीवर जिल्ह्यांतील विविध घटकांशी संवाद साधण्यासाठी सुप्रिया सुळे यांचा दौरा असल्याची माहिती आहे.संवाद दौऱ्याचा पहिल्या टप्प्यात 23 ऑगस्टपासून 31 ऑगस्टपर्यंत महाराष्ट्रातील अहमदनगर, सोलापूर, जळगाव, नाशिक, ठाणे, नागपूर, नवी मुंबई या जिल्ह्यात सुप्रिया सुळे फिरणार आहेत.

दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांनी खुंटलेल्या विकासाचा मुद्दा पुढे करून भाजप सेनेत पक्षांतर केले आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यात निवडणुकी आधीच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अस्तित्व धोक्यात आले आहे. त्यामुळे पक्षाला सावरण्यासाठी खा. अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली शिवस्वराज्य यात्रा काढण्यात आली आहे. तर आता खा. सुप्रिया सुळे देखील संवाद दौरा काढून पक्षाची पडती बाजू सांभाळणार आहेत.

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: