मुंबई : ताई, तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुमची सगळी जबाबदारी महाराष्ट्र सरकार घेईल असा विश्वास देणारा फोन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. त्यांनी ताई म्हटले आणि मला माझा भाऊच माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्यासारखे वाटले. मुख्यमंत्री सरांनी मला मदत केली.
मी आताच महाराष्ट्र सदनमध्ये राहण्यासाठी आले. आता मुंबईला कधीही जायला मिळो, मला आत्ताच घरी आल्यासारखे वाटतेय, माझ्या लोकांमध्ये आल्यासारखे वाटतेय, इस्त्राईलहून दिल्लीला परतलेल्या पण लॉकडाऊनमुळे तिथेच अडकून पडलेल्या श्रीमती एलिझाबेथ पिंगळे आनंदाने सांगत होत्या.
एलिझाबेथ पिंगळे, मुलुंडच्या रहिवाशी, आजारी वडिलांना भेटायला इस्त्राईलला गेल्या. दुर्दैवाने वडिलांचे निधन झाले आणि त्यांचे तेथील वास्तव्य लांबले. त्या २१ मार्चला निघून २२ मार्चला नवी दिल्लीत पोहोचल्या. संध्याकाळी मुंबईचे विमान होते.
परंतु त्यांना क्वारंटाईन होण्यास सांगितले गेले. त्या हॉटेलमध्ये क्वारंटाईन झाल्या. १४ दिवसानंतर अचानक हॉटेल व्यवस्थापनाने त्यांना हॉटेल बंद होत असल्याचे कारण सांगत त्यांची सोय दुसऱ्या हॉटेलमध्ये केली व ते पसंत नसल्यास स्वत:ची व्यवस्था स्वत: करण्यास सांगितले.
श्रीमती एलिझाबेथ यांनी स्वत:सह महाराष्ट्रातील ४० जण येथे अडकले असून या सर्वांना मदत करावी असा संदेश देणारा व्हिडिओ तयार करून तो व्हॉट्सअप वर टाकला. या व्हिडिओची दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एलिझाबेथ पिंगळे यांच्याशी नवी दिल्ली येथे दूरध्वनीहून संपर्क साधला आणि त्यांची व्यवस्था महाराष्ट्र सदन येथे करण्यात येत असल्याचे सांगितले. १४ दिवसांच्या क्वारंटाईननंतर आणि आरोग्य विभागाच्या मान्यतेनंतर आज त्या महाराष्ट्र सदन येथे सुखरूप पोहोचल्या.
तुम्ही एकट्या नाहीत. घाबरून जाऊ नका. आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत हे सांगणारा आश्वासक संवाद आणि पुढे केलेला मदतीचा हात पाहून मी खूप भारावून गेले आहे. आपल्याच माणसांनी इतकी आस्थेवाईकपणे चौकशी केली. माझी व्यवस्था केली.
मी त्या सगळ्यांची विशेषत: मुख्यमंत्री, त्यांचे प्रधान सचिव विकास खारगे सर, महाराष्ट्र सदनातील अधिकारी आणि इतर अधिकारी या सगळ्यांची खूप आभारी आहे. एलिझाबेथ पिंगळे सांगत होत्या आणि त्यांच्या प्रत्येक शब्दामधून उत्साह आणि आनंद ओतप्रोत डोकावत होता.
click and follow Indiaherald WhatsApp channel