मुंबई : सर्व धर्माच्या प्रमुख गुरू व धार्मिक नेत्यांना विनंती करून कोणत्याही परिस्थितीत गर्दी होणार नाही तसेच सामाजिक अंतर पाळले जाईल,असे आवाहन करणे खूप गरजेचे आहे. असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये सांगितले.

मुख्यमंत्री ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आज व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना राज्यातील कोरोनाच्या सद्य स्थितीबाबत माहिती दिली.

यावेळी दिल्लीतील मरकज कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी देशातील सर्व राज्यातील सर्व मुख्यमंत्र्यांना आपापल्या राज्यातील धार्मिक गुरूंशी तातडीने संवाद साधून तळागाळापर्यंत आवाहन करावे, असे सांगितले.

त्याचप्रमाणे, स्थलांतरित परराज्यातील श्रमिक, कामगार यांच्यासाठी राज्य सरकार पुरेपूर काळजी घेत असून 3 हजार निवारा केंद्रांतून 3 लाख 25हजार व्यक्तींना निवारा, दोन वेळेसचे भोजन दिले जात आहे.

त्यांचे मानसिक स्वास्थ्य चांगले राहील यासाठीही काही तज्ञ , डॉक्टर नियुक्त केले आहेत. परराज्यात अडकलेल्या महाराष्ट्रातील लोकांना देखील आपण आहे तिथेच राहा, तुमची काळजी घेतली जाईल, असेही सांगितल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील कोरोनाच्या सद्यस्थितीची आणि भविष्यातील नियोजनाची माहिती दिली. मुख्यमंत्री म्हणाले, ‘ राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता मुंबई महानगरपालिकेच्या 4 वैद्यकीय महाविद्यालये आणि नर्सिंगमधून एमबीबीएस च्या विद्यार्थ्यांना आम्ही विशेष कक्षासाठी प्रशिक्षण दिले जात आहे.

नव्या प्रोटोकॉलप्रमाणे लक्षणे नसणाऱ्या व्यक्तींचे देखील रुग्णालयाबाहेर विलगीकरण केले जात आहे. विलागीकरण केलेल्यांनासाठी पालिका अधिकारी आणि पोलिसांच्या देखरेखीखाली लॉजेस, क्लब्स, मंगल कार्यालये ताब्यात घेतले आहेत.

पुढे गरज पडल्यास तयारी असावी म्हणून एखादी मोठी जागा निश्चित करून याठिकाणी आयसोलेशन व क्वारंटाईन सुविधा उभारण्याचे नियोजन आहे अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: