मुंबई : ‘आरसेप’ अर्थात प्रादेशिक व्यापक आर्थिक भागिदारी योजनेचा करार त्वरीत रद्द करावा या मागणीसाठी मुंबईत सोमवारी मंत्रालयासमोर दुधाच्या पिशव्या फोडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन केले. या आंदोलनानंतर राजू शेट्टी आणि आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात पुढील कारवाई सुरु आहे.

प्रादेशिक व्यापार आर्थिक भागीदारी योजनेचा करार त्वरित रद्द करावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारी मंत्रालयासमोर दुधाच्या पिशव्या फोडून आंदोलन केले. यावेळी सरकारचा निषेध करत घोषणाबाजीही करण्यात आली. सोळा देशांसोबत केल्या जाणार्‍या या कराराचा फटका शेती, दुग्ध व्यवसाय आणि वस्त्रोद्योग या तिन्ही व्यवसायांना बसणार आहे. त्यामुळे हा करार त्वरीत थांबवावा, अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे.

आंदोलनाची पार्श्‍वभूमी आग्नेय आशियाई राष्ट्र समूह आणि त्यांच्याशी व्यापारी भागिदारी असलेले भारत, चीन, ऑस्ट्रेलिया, न्युझीलंड, जपान व दक्षिण कोरिया यांचा समावेश असलेल्या देशांच्या गटातर्फे ‘रिजनल कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप’ (आरसेप) या व्यापार विषयक करारावर आज ( दि. 4) स्वाक्षरी होणार आहेत.भारतातर्फे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी बँकॉक येथे होत असलेल्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

मात्र, या करारातील तरतुदी या भारतीय शेतकर्‍यांच्या मुळावर येणार असून दुधासह अनेक गोष्टींवरचे आयात शुल्क कमी करावे लागणार आहे. त्यामुळे चीन, ऑस्ट्रेलिया, न्युझीलंड या देशातील मालाने भारतीय बाजारपेठा भरून जाणार आहेत. यामुळे आधीच मंदीच्या फेर्‍यात अडकलेला शेतकरी आणि इतर घटक आणखी अडचणीत येणार आहेत. त्यामुळे सध्याच्या स्थितीत या करारावर भारताने स्वाक्षरी करू नये अशी जनता दल तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी आहे.

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: