महापुराने होत्याचे नव्हते झाले असून तुम्ही एकटे नसून तुमच्या मागे सर्व महाराष्ट्र उभा आहे’, असा दिलासा माजी केंद्रीय कृषी मंत्री, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे दिला. तसेच नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना पुन्हा उभे करण्यासाठी कर्जमाफीसह आर्थिक मदतीचीही मागणी केंद्र व राज्य सरकारकडे करू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

पवार यांनी पूरबाधित असलेल्या करवीर तालुक्‍यातील चिखली, आंबेवाडी, वरणगे पाडळी या गावांसह शहरातील शाहुपुरी कुंभार गल्ली, बापट कॅंप येथील पूरग्रस्तांची भेट घेऊन त्यांच्या भावना जाणून घेतल्या. यावेळी आमदार हसन मुश्रीफ, आमदार चंद्रदीप नरके, माजी खासदार धनंजय महाडिक, पी. एन. पाटील उपस्थित होते.

पवार यांनी पूरग्रस्तांशी संवाद साधत घरात ओल आली असेल तर तुम्ही राहता कुठे? अशी विचारणा केली. तेव्हा आम्ही सध्या कोल्हापूरातील बुधवार पेठेत तात्पुरते स्थलांतरीत असल्याचे पूरग्रस्तांनी सांगितले. पुरामुळे कुणाची घरे पडली आहेत त्यांनी हात वर करावा असे सांगितले. यावर बहुतांश जणांनी हात वर केले. त्यावर पवार यांनी महाराष्ट्र तुमच्या मागे आहे, असे सांगितले.                                                                           


మరింత సమాచారం తెలుసుకోండి: