औरंगाबाद : औरंगाबाद महापालिका निवडणुकांच्या तोंडावर पक्षांतराला उधाण आलं आहे. भाजपचे माजी शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. तनवाणी यांच्यासह भाजपचे सात ते आठ नगरसेवक फुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

औरंगाबाद महापालिका निवडणुका अवघ्या काही दिवसांवर आलेल्या असताना भाजपला मोठा धक्का बसणार आहे. भाजपचे माजी शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी औरंगाबादहून मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. तनवाणी आणि गजानन बरवाल आज ‘मातोश्री’ निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर तनवाणी हाती शिवबंधन बांधतील.

 

औरंगाबादचं ‘संभाजीनगर’ असं नामांतर करण्याच्या हालचालींना मुख्यमंत्र्यांकडून वेग आलेला आहे. अशातच मनसे आणि भाजपनेही निवडणुकांच्या प्रचारात हा मुद्दा उचलून धरला आहे. त्यामुळे औरंगाबादमध्ये राजकीय ताकद वाढवण्यासाठी शिवसेना सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसत आहे.

 

विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने नऊपैकी सहा जागांवर विजय मिळवला होता. काहीच दिवसांपूर्वी औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा विश्वासू पदाधिकारी सुहास दशरथे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. दशरथे हे शिवसेनेचे लोकसभा सहसंपर्क प्रमुख म्हणून कार्यरत होते. गेल्या 38 वर्षांपासून दशरथे हे शिवसेनेत कार्यरत होते. त्यामुळे शिवसेनेला हादरा बसल्याचं बोललं जात होतं.

 

दरम्यान, एप्रिल 2020 मध्ये औरंगाबाद महापालिकेची निवडणूक होणार आहे. त्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना पुन्हा महाविकास आघाडीने निवडणुकांना सामोरी जाण्याच्या तयारीत आहेत. मनसे आणि भाजपने स्वबळाचा नारा दिला आहे. या पक्षांपुढे तगड्या एमआयएमचंही आव्हान आहे.

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: