पोर्ट ऑफ स्पेन- वेस्ट इंडिज विरोधातील दुसऱ्या एक दिवसीय सामन्यात टीम इंडियाने कर्णधार विराट कोहलीचे शतक व श्रेयस अय्यरच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर दणदणीत विजय मिळवला आहे. डकवर्थ लुईस नियमानुसार टीम इंडियाने वेस्ट इंडिजवर ५९ धावांनी मात केली.
टीम इंडियाने पहिल्यांदा फलंदाजी करत 7 गडी राखून २७९ धावांचे लक्ष वेस्ट इंडिजला दिले होते. पण पावसाचे सामन्या दरम्यान आगमन झाल्याने खेळात व्यत्यय आल्यामुळे यजमान संघाला विजयासाठी ४६ षटकात २७० धावांचे लक्ष्य देण्यात आले. नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या भारतीय संघाची सुरुवात काही खास नव्हती. विराट कोहलीने रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यरच्या साथीने महत्वाची भागीदारी करत भारतीय संघाला आवश्यक धावसंख्या उभारुन दिली. पण मोक्याच्या षटकांवेळी विंडीजच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजीवर अंकुश लावल्यामुळे भारतीय फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारण्यास अपयश आले.
प्रत्युत्तरात वेस्ट इंडिज संघ फक्त २१० धावाच काढू शकला. एविन लुईस वगळता एकही फलंदाज भारतीय गोलंदाजांचा सामना करु शकला नाही. आक्रमक पद्धतीने वेस्ट इंडिजच्या संघाने डावांची सुरुवात केली. मात्र ४५ धावांची भागीदारी झाल्यानंतर भुवनेश्वर कुमारने ख्रिस गेलला माघारी पाठवले. यानंतर शाई होप, शेमरॉन हेटमायर देखील जास्त काळ खेळ पट्टीवर तग धरू शकले नाही. यानंतर निकोलस पूरन आणि लुईस यांनी चौथ्या विकेटसाठी ५६ धावांची अर्धशतकी भागीदारी केली. यावेळी विंडीज मोठी खेळी करेल, अशी आशा निर्माण झाली होती. मात्र कुलदीपने एविन लुईसला बाद केल्यानंतर जिंकण्याच्या सर्व आशा मावळल्या. एविन लुईसने ६५ धावा केल्या होत्या.
यानंतर आत्मविश्वासाने बळावलेल्या भुवनेश्वर कुमारने वेस्ट इंडिजच्या अखेरच्या फळीला देखील शिताफीने माघारी पाठविले. रोस्टन चेस, केमार रोच, कार्लोस ब्रेथवेट झटपट माघारी परतले. विंडीजच्या तळातल्या फलंदाजांनाही फारशी लढत देता आली नाही. परिणामी, गोलंदाजांमुळे भारतीय संघाचा विजयाचा मार्ग मोकळा झाला. या सामन्यात भारताकडून भुवनेश्वर कुमारने ४, कुलदीप यादव, मोहम्मद शामी यांनी प्रत्येकी २ तर खलिल अहमद, आणि रविंद्र जडेजाने प्रत्येकी १ बळी घेतला.
click and follow Indiaherald WhatsApp channel