मुंबई – कोरोनाचा उद्रेक देशात आणि राज्यात झाल्याने काही दिवसांतच चित्र पालटले असून राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. सर्वच क्षेत्रांना लॉकडाउनमुळे झळ सोसावी लागत असून, यामुळे राज्याच्या उत्पन्नाला फटका बसला आहे.
राज्याचे उत्पन्न कोरोनामुळे जवळपास थांबले आहे. राज्यासमोर गंभीर आर्थिक परिस्थिती निर्माण झाली असून, केंद्र सरकारचे याकडे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी लक्ष वेधले आहे. त्यांनी यासंदर्भात केंद्राला पत्र पाठवले आहे.
केंद्र आणि राज्य सरकारकडून कोरोनाचे रुग्ण वाढत असताना कठोर निर्णय घेतले जात आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे लक्षात आल्यानंतर देशात केंद्र सरकारने लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय घेतला. अशा प्रकारचा निर्णय महाराष्ट्रात अगोदरच घेण्यात आला होता. दरम्यान, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांमुळे उद्योग क्षेत्राला झळ सोसावी लागत आहे. राज्य सरकारच्या तिजोरीलाही त्याचा फटका बसू लागला आहे.
राज्याच्या तिजोरीत येणारे उत्पन्न थांबले असून राज्यासमोर सध्या गंभीर आर्थिक परिस्थिती निर्माण झाली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याशी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी पत्रव्यवहार करून चिंता व्यक्त केली आहे. त्याचबरोबर अशा संकटात केंद्राने विशेष पॅकेज जाहीर करावे, अशी मागणीही केली आहे.
देशात केंद्र सरकारने तीन आठवड्यांचा लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे उद्योग, व्यापार, सेवा क्षेत्र ठप्प आहे. आर्थिक वर्षाच्या अखेरच्या महिन्यात राज्याच्या उत्पन्नात मोठी भर पडते. परंतु,कोरोना आणि लॉकडाऊनमुळे यंदा उत्पन्न जवळपास थांबले आहे. राज्यासमोर गंभीर आर्थिक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच केंद्र सरकारकडून केंद्रीय करातील हिश्यापोटी राज्याला मिळणारे १,६८७ कोटी तसेच मदतरुपी अनुदानापोटी मिळणारे १४ हजार ९६७ कोटी रुपये अशी एकूण १६ हजार ६५४ कोटींची थकबाकी अद्याप मिळालेली नाही.
ही थकबाकी ३१ मार्चपर्यंत राज्याला मिळावी. तसेच ‘कोरोना’च्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी २५ हजार कोटींचे विशेष पॅकेज महाराष्ट्राला मंजूर करावे, यासंबंधीचे पत्र अर्थमंत्री निर्मला सीतारामन, राज्याचे केंद्रातील मंत्री नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर यांना पाठवले असल्याची माहिती अजित पवार यांनी ट्विट करून दिली आहे.
महाराष्ट्र सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण असलेल्या राज्यांच्या यादीत देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. केरळमध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत. गेल्या काही दिवसात राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा वेगाने वाढत असल्यामुळे सरकारच्या चिंतेत भर पडली आहे.
click and follow Indiaherald WhatsApp channel