बारामती : भांडवली गुंतवणूक वाढत नाही तोपर्यंत मंदीतून बाहेर पडणं अशक्यअसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं. देशात निर्माण झालेल्या मंदीचा सर्वच क्षेत्रांना फटका बसलाय. त्यामुळे मागील काही दिवसांत अनेक क्षेत्रात लोकांना कमी करण्याचा पर्याय अवलंबला जातोय. हे प्रमाण वाढत राहिलं तर अनेकांच्या हाताला कामच राहणार नाही. पर्यायाने देशात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही, अशी भीतीही शरद पवार यांनी व्यक्त केली.

बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीने आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात शरद पवार यांनी देशात निर्माण झालेल्या मंदीवर भाष्य केलं. सामान्य माणसाची खरेदी करण्याची ताकद वाढत नाही, तोपर्यंत व्यापार वाढत नाही. पर्यायाने व्यापार आणि उद्योग वाढवल्याशिवाय मंदीतून बाहेर पडणं शक्य होणार नसल्याचं शरद पवार यांनी सांगितलं. सध्याच्या स्थितीत लोकांना कमी करण्यापेक्षा संबंधित उद्योग संस्थांनी स्वतःचा खर्च कमी करून या संकटाला सामोरं जावं, असं आवाहनही त्यांनी केलं.

काळ्या आईशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्यांनी केलेल्या काबाडकष्टामुळे आज देशात शेतमालाची कमतरता नाही. एकेकाळी आयात करणारा भारत देश निर्यातदार बनलाय. मात्र असं असलं तरी सरकारच्या धोरणामुळे अनेकदा संकटं येतात. शेतमालाचे दर वाढले की परदेशातून माल आयात केला जातो, ही बाब शेतकऱ्यांसाठी घातक असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं. अशा परिस्थितीत निर्यातीला, विक्रीला आणि शेतमाल प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

दरवर्षी 16 ते 18 हजार शेतकरी आत्महत्या करत आहेत. शेतकऱ्याने आत्महत्त्या केली नाही, असा एकही दिवस जात नाही. एखाद्या शेतकऱ्याने आत्महत्त्या केली की त्याचं घर उघड्यावर पडतं. कुटुंबातली संकटं कमी होण्याऐवजी वाढतच जातात. त्यामुळे संकटांना धैर्याने तोंड दिलं पाहिजे. खर्च कमी करून, काटकसर करून आणि चुकीच्या गोष्टी टाळून पिकातून दोन पैसे कसे मिळतील याची काळजी घेत या संकटातून बाहेर पडण्याची भूमिका घ्यायला हवी असंही शरद पवार यांनी यावेळी सांगितलं.


మరింత సమాచారం తెలుసుకోండి: